मुख्य बातमी
जिल्ह्यात दीड दिवसाच्या गणपतीला भक्तीमय वातावरणात निरोप

रत्नागिरी : जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना गुरुवारी भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. तब्बल १३ हजार ८३४ घरगुती तसेच ७ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागात विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गजराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. विसर्जन मिरवणुकांदरम्यान ढोल-ताशांचा गजर, लेझीम आणि फटाक्यांची आतषबाजी रंगत आणत होती. महिला, युवक तसेच बालगोपाळांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. रत्नागिरी शहरातील मांडवी, भाट्ये समुद्रकिनारी गणेश विसर्जनासाठी भक्तांची गर्दी झाली होती. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.



