विविध कृषी पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

रत्नागिरी : राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र, फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्याचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था/गट यांना विविध कृषी विभागामार्फत पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.
कृषी विभागामार्फत सन २०२४ या वर्षामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती/गट/संस्था यांच्याकडून विविध कृषी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. जास्तीत जास्त शेतकरी/गट/संस्था/व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कारासाठी प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
कृषी विभागामार्फत देण्यात येणारे विविध कृषी पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक राज्यातून एक शेतकऱ्याकरीता डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार ३ लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र स्वरुपात देण्यात येतो. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे ८ पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार २ लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र स्वरूपात देण्यात येतो.
फक्त महिला शेतकऱ्यांसाठी प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे ८ पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार २ लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तिपत्र स्वरूपात देण्यात येतो. सेंद्रिय शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे ८ पुरस्कार, कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २ लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र स्वरूपात देण्यात येतो.
शेती क्षेत्रात प्रभाविरीत्या विस्तार कार्य करणारे शेतकऱ्यांना प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे ८ पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, १ लाख २० हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र स्वरूपात देण्यात येतो.
फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकऱ्यांना उद्यानपंडित पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे ८ पुरस्कार, १ लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र स्वरूपात देण्यात येतो. १८ ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे ८ पुरस्कार, १ लाख २० हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र स्वरूपात देण्यात येतो.
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गटासाठी प्रती जिल्हा १ याप्रमाणे ३४ आणि आदिवासी गटासाठी प्रती विभाग १ याप्रमाणे ६ असे एकूण ४० पुरस्कार, ४४ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र स्वरूपात देण्यात येतो.


