सीएसआर निधीतून पाच टक्के रक्कम दिव्यांग सर्वांगीण पुनर्वसनासाठी राखीव ठेवावी
"आस्था"च्या वतीने पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात निवेदन

रत्नागिरी : कंपनींच्या सीएसआर निधीतून पाच टक्के रक्कम दिव्यांग सर्वांगीण पुनर्वसनासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी आस्था सोशल फाउंडेशनने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनामध्ये निधीचा तुटवडा हा मोठा अडथळा ठरतो. पूर्वी दिव्यांगत्वाचे ७ प्रकार होते; परंतु आता दिव्यांगत्वाचे २१ प्रकार झाले आहेत. त्यामुळे दिव्यांगांची संख्या देखील वाढली आहे. म्हणूनच अपुऱ्या निधीमुळे दिव्यांगांचे मागणी प्रस्ताव सर्व स्तरावर प्रलंबित राहत आहेत. याकरिता उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (१७ एप्रिल) आयोजित केलेल्या जनता दरबारात आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी च्या वतीने कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३५ अंतर्गत असलेल्या सीएसआर सामाजिक बांधिलकी निधीतून पाच टक्के रक्कम दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्यात यावे, असे निवेदन दिले. हे निवेदन देताना “आस्था”च्या सचिव सुरेखा पाथरे, संकेत चाळके, संपदा कांबळे, हसना नेवरेकर, ओवी ओर्पे, आल्हाद पाथरे हे दिव्यांग प्रतिनिधी उपस्थित होते.



