कोणतीही दुर्घटना होवू नये, याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री डाॕ उदय सामंत
जिल्हा मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक

रत्नागिरी : जिल्ह्यात यापूर्वी आलेला पूर, वादळाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क राहून, समन्वयाने काम करावे. कोणतीही दुर्घटना होवू नये, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज (२० मे) जिल्हा मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, सभापती महेश नाटेकर, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदीसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली.
पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील नदी काठावर राहणारी वस्ती आहे, त्याठिकाणी आपली यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी. घाटामध्ये दरड कोसळून अपघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी. याठिकाणी कोणतीही आपत्ती उद्भवल्यास सर्व यंत्रणा उपलब्ध ठेवावी. दरड प्रवण क्षेत्रात दरड कोसळू नये, यासाठी उपाय योजना कराव्यात. मंडणगड येथील राज्य महामार्गाला संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती कार्यवाही करावी. रस्ता सुस्थितीत करावा. पावसाळ्यामध्ये एसटी बसेस गावामंध्ये पोहचण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची आताच दक्षता घ्या.
आरोग्य विभागाचा औषध साठा, रुग्णवाहिका, ग्रामीण रुग्णालय आदीचा आढावा घेत पावसाळ्यातील साथीच्या रोगांना आळा घालण्याच्या दृष्टीने यंत्रणा तयार ठेवावी. महावितरणने पावसाळ्याच्या दृष्टीने कामे तात्काळ पूर्ण करावीत. रेल्वेने ज्या ठिकाणी भूस्खलन होते, त्यासाठी सतर्क रहावे. तहसीलदारांनी आपल्या क्षेत्रामध्ये ज्याठिकाणी दरड कोसळू शकते, भूस्खलन होऊ शकते, पूर येतो अशा ठिकाणी भेट देऊन त्याबाबतचा सविस्तर अहवाल दोन दिवसात सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या.
पालकमंत्र्यांनी महसूल, महावितरण, रेल्वे, बंदर विभाग, मेरीटाईम बोर्ड विभाग, पतन विभाग, आरोग्य विभाग आदी विभागांचा आढावा घेतला.


