पोलीस स्मृतीदिनी शहीद पोलीस जवानांना अभिवादन

रत्नागिरी : कर्तव्याच्या ओघात प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या शौर्यस्मृतींना अभिवादन करण्यासाठी पोलीस स्मृती दिन आज (२१ ऑक्टोबर) रत्नागिरी पोलीस मुख्यालयात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी हुतात्मा पोलीस जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा पोलीस जवानांची नावे सन्मानपूर्वक वाचण्यात आली. शोकसंगीतानंतर सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. “देशातील अंतर्गत शांती आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले पोलीस जवान अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित आहोत. समाजाने या शूर जवानांचे ऋण मानावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना नेहमी सन्मान द्यावा,” असे आवाहन सामंत यांनी यावेळी बोलताना केले. पोलिसांच्या सुखसोयींसाठी जे काही सहकार्य लागेल ते करण्याचा शब्दही त्यांनी दिला.

अनेक वर्षांपासून पोलिसांच्या निवासस्थानांची तसेच पोलीस अधीक्षक (एसपी) कार्यालयाच्या उभारणीची मागणी होती. ती मागणी महाराष्ट्र शासनाने मान्य करून १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे यावेळी पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.




