मुख्य बातमी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमकतेपुढे कॅनिंग कंपन्या नरमल्या

दरामध्ये किलोमागे ५ रुपयांची वाढ : १५ तारखेनंतर आंदोलनाचा इशारा कायम

रत्नागिरी : जिल्ह्यातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरे गटाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, दर कमी करणाऱ्या कॅनिंग कंपन्या आता बॅकफुटवर गेल्या आहेत. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इशाऱ्यानंतर कंपन्यांनी सावध पवित्रा घेत हापूसच्या दरात किलोमागे ५ रुपयांची वाढ केली आहे. मात्र, ही वाढ पुरेशी नसून शेतकऱ्यांना प्रति किलो किमान ७५ रुपये दर मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी मांडली आहे.

एका शेतकऱ्याने पाठवलेल्या संदेशाची दखल घेत ही बातमी समोर आली असून, त्यात नमूद केल्यानुसार ठाकरे गटाच्या वाढत्या दबावामुळे कंपन्यांनी आता दरांबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. या संदर्भात बाळ माने यांनी स्पष्ट केले की, ७५ रुपये किलो दर मिळावा ही शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे. जर प्रशासनाने आणि कंपन्यांनी यावर सकारात्मक तोडगा काढला नाही, तर येत्या १५ मे रोजी नियोजित भव्य मोर्चा काढला जाईल.

इतक्यावरच न थांबता, १५ मेच्या मोर्चानंतरही मागण्या मान्य न झाल्यास, १७ मे रोजी जिल्ह्यातील मोठ्या खरेदीदार कंपन्यांच्या फॅक्टरीवर शिवसेना आणि शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला आहे. एकूणच ठाकरे गटाच्या या आक्रमकतेमुळे कॅनिंग कंपन्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून, येत्या काळात हापूसच्या दराचा पेच सुटणार की संघर्ष अधिक तीव्र होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!