दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ सप्टेंबर

रत्नागिरी : भारतीय टपाल विभागातर्फे आयोजित फिलाटेली (पोस्टाची तिकिटे जमविण्याचा) छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना” सुरू करण्यात आली असून, यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ सप्टेंबरपर्यंत आहे. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये होणाऱ्या दीनदयाळ शिष्यवृत्ती योजना परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले यांनी केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांना पोस्टाच्या तिकीट संग्रहामध्ये रुची निर्माण व्हावी या साठी भारतीय टपाल विभागातर्फे दिन दयाळ स्पर्श योजना २०१७-१८ पासून सुरू करण्यात आली आहे. फिलाटेली हा छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर ४० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे . ही योजना सहावी ते नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. शिष्यवृत्तीची रक्कम रुपये ६ हजार वार्षिक (५००/- प्रतिमाह) मिळेल. विद्यार्थी मान्यता प्राप्त शाळेत शिकणारा असावा त्याचबरोबर recent वार्षिक परीक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण (SC/ST मधील विद्यार्थ्यांना ५ टक्के relaxation) किंवा समतुल्य श्रेणी किंवा ग्रेड पॉइंट असणे बंधनकारक आहे. शाळेचा फिलाटेली क्लब असावा आणि संबंधित विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असणे आवश्यक आहे. शाळेचा क्लब नसेल तर त्या सबंधित विद्यार्थ्याचे स्वतंत्र फिलाटेली अकाऊंट असणे आवश्यक आहे.
शिष्यवृती परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते. प्रथम लेखी परीक्षा विभागीय स्तरावर घेतली जाईल. पहिल्या स्तरामध्ये निवड झालेल्या विद्यार्थांना अंतिम निवडीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये फिलाटेली प्रकल्प सादर करावा लागेल. अंतिम निवड केवळ फिलाटेली प्रकल्पामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेमध्ये ५० बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील. प्रत्येक प्रश्न १ गुणाचा असेल आणि त्यात कोणतेही negative marking नसेल. लेखी परीक्षा संपूर्ण विभागासाठी एकाच वेळी रत्नागिरीमध्ये घेतली जाईल. स्थळ नंतर कळविण्यात येईल. प्रकल्पाचा विषय सर्कल ऑफिस द्वारा देण्यात येणार असून, टपाल खात्याचे प्रतिनिधी आणि प्रसिद्ध फिलाटेलिस्ट यांचा समावेश असलेली एक समिती सर्कल पातळीवर स्थापन केली जाईल आणि त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यानी केलेल्या प्रकल्पाचे मूल्यमापन केले जाईल.
या योजनेसाठीची लेखी परीक्षा २८ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल. इच्छुक शाळा प्रतिनिधींनी सहभागासाठी जवळील पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा व आपले अर्ज नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये ९ सप्टेंबरपर्यंत जमा करावेत.
२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३१ विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता. त्यामधील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडीयम शाळेच्या एका विद्यार्थ्याचे महाराष्ट्र सर्कल स्तरावरती सिलेक्शन होऊन शिष्यवृत्ती प्राप्त झाली.


