मुख्य बातमी

राज्यामध्ये प्रगती आणि समृद्धी सरकार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकरी आपला अन्नदाता, आपला मायबाप ; बियाणे अतिशय उत्कृष्ट प्रतीची हवीत

रत्नागिरी : राज्यामध्ये प्रगती सरकार आणि समृध्दी सरकार आहे. राज्याला पुढे नेणारे सरकार आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे, त्याला जे बियाणे देतो ते अतिशय उत्कृष्ट चांगल्या प्रतीची असली पाहिजेत, याची नोंद अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद व कृषी विभाग नाविन्यपूर्ण घटक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना भात व नाचणी पिकाचे मोफत बियाणे, सिंधुरत्न समृध्द योजनेतून आंबा वितरकांना चारचाकी वाहन वितरण तसेच नागरी सुविधा योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी ८० सीएनजी घंटागाड्यांचे वितरण आज उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “गेल्या तीन वर्षांमध्ये रत्नागिरीमध्ये लोकाभिमुख विकास प्रकल्प उभे राहिले आहेत. दिलेला निधी विकासकामांना वापरा एवढी माझी अट होती. कामाचा दर्जा अतिशय चांगला असला पाहिजे. वेळेमध्ये काम पूर्ण झाले पाहिजे, ही माफक अपेक्षा ठेवून निधी दिला. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये ज्या निधीचे वाटप झाले, त्याची कामे आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. कुठेही आम्ही मागे राहणार नाही एवढाच विश्वास आपल्याला देऊ इच्छितो.”

“महाराष्ट्र नंबर एकमध्ये उद्योगात आहे. देशभराच्या ४० टक्के गुंतवणूक फक्त महाराष्ट्रामध्ये. याचं कारण महाराष्ट्रात लोक येतात. उद्योग वाढवू इच्छितात. टाटाच्या माध्यमातून देखील स्किल डेव्हलपमेंट सेंटर करतोय. इन्वेंशन इनोवेशन इंक्युपेशन सेंटर आपण गडचिरोलीत करतोय. जिल्हा परिषद ग्रामीण भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. या घंटागाड्या आपल्याला फायदेशीर ठरतील. आरोग्य आपले समृद्ध राहील. कचरा आपल्याला डम्प करता येणार नाही. त्याच्यावर प्रक्रिया करणे ही देखील काळाची गरज आहे. पावसाळी शेती आपल्याला करून भागणार नाही, आपल्याला समुद्राला वाहून जाणारे पाणी थांबवले पाहिजे. यावर देखील आपले सरकार काम करते. मत्स्य उद्योगाला उद्योगाचा दर्जा दिला. हाऊस बोटची संख्या वाढली पाहिजे. बचत गटाला त्याचा फायदा झाला पाहिजे,”असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“गटशेतीकडे वळले पाहिजे. इथला शेतकरी रोजगारासाठी दुसरीकडे जाता कामा नये. गेलेला तो पुन्हा वापस आला पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आमचा प्रयत्न नक्की राहणार आहे,” अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी दिली.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, “भात, नाचणी पीक आमच्याकडे मोठ्या पद्धतीने येते. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम देखील नियोजन मंडळातून होत आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या मार्फत, रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने विनंती करतो, ज्या सिंधुरत्न योजनेमुळे अनेकांना वैयक्तिक लाभ मिळाले, ते वैयक्तिक लाभ पुढे देखील चालू राहण्यासाठी ही सिंधूरत्न योजना ही कायमस्वरूपी चालू ठेवावी. दोन वर्षानंतर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किमान १५ ते २० हाऊसबोट बचत गट चालवतील अशा पद्धतीची यंत्रणा आम्ही सुरू केली. एसटी स्टँडमधील कॅन्टीन देखील महिला बचत गटाने चालवले पाहिजे. असे कॅन्टीन चालविणारे रत्नागिरी राज्यातील एकमेव असणार आहे. महिला सांगतील की सख्ख्या भावाने जेवढे केले नाही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढून सख्या भावाच्या पलीकडे जाऊन तुमच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या महिला भगिनींवर केले आहे. नसतं तर या योजना मी जिल्ह्याला देऊ शकलो नसतो ते देखील योगेश जी तुम्हाला अपेक्षित असलेला विकसित जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा भविष्याच्या कालावधीमध्ये आम्ही करून दाखवू,” असा शब्दही पालकमंत्र्यांनी दिला.

ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, “महाराष्ट्रमध्ये अनेक जिल्हा परिषदांना भेटी देत असताना, तिथे आम्ही अभिमानाने उद्योग मंत्र्यांच्या कार्यासंबंधी उल्लेख करतो. जवळपास ११ जिल्ह्यांमध्ये जाऊन आलो आहे; परंतु, कुठल्या जिल्ह्यामध्ये मला अशा प्रकारचे उपक्रम मला कुठेच आढळले नाहीत. योजना अनेक असतात. त्या जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता एक प्रतिनिधित्वं लागते. एक लीडरशिप घ्यावी लागते किंवा पुढाकार घ्यावा लागतो. तो पुढाकार आपण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपण जेवढे या रत्नागिरी जिल्ह्याला दिलेला आहे, निधीचे आपण जे वाटप केलेले आहे, ज्या योजना आपण इथे राबवल्यात, मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एवढा निधी कधी आलेला असेल. रत्नागिरी जिल्ह्यावर आपण कदापि अन्याय होऊ देणार नाही. या कोकणावरती आपले कायम प्रेम असेल.”

अपर मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांनी स्वागत प्रस्ताविक केले. कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!