न्यूमोनिया प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ‘सांस’ मोहिमेला प्रारंभ
० ते ५ वर्षे बालकांच्या आरोग्यरक्षणासाठी प्रभावी उपक्रम

रत्नागिरी : न्यूमोनियासारख्या जीवघेण्या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यभरात ‘सांस’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. ही मोहीम १२ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबवली जाणार असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘सांस’ मोहिमेच्या नियोजानासाठी बैठक पार पडली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मलीनाथ कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. एकूण होणाऱ्या बालमृत्यूंपैकी तब्बल १६.३ टक्के मृत्यू न्यूमोनियामुळे होत असल्याने सदर सांस मोहीमच्या यशस्वितेसाठी आरोग्य विभागाने सर्वोतोपरी प्रयत्न करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जिंदल यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका घराघरात भेट देऊन ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करणार असून, न्यूमोनियाची लक्षणे आढळल्यास त्वरित प्राथमिक उपचार आणि आवश्यक असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच या मोहिमेबाबत सोशल मीडिया, पोस्टर, बॅनर, हस्तपत्रिका आदी माध्यमांतून व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
जलद श्वास, छातीत आत ओढले जाणे, ताप, सतत किंवा जास्त काळ खोकला, श्वास घेण्यास त्रास/धाप लागणे, बाळ दूध न पिणे, बाळ सुस्त पडणे किंवा खूप रडणे, खेळणे बंद करणे,बेशुद्ध पडणे, ओठ व बोटे निळसर दिसणे, ऑक्सिजन पातळी ९० टक्क्यांपेक्षा कमी होणे ही लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जन्मानंतर ६ महिने निव्वळ स्तनपान, योग्य व पूरक आहार, पूर्ण लसीकरण, वैयक्तिक स्वच्छता, धुररहित स्वयंपाकगृह, हिवाळ्यात मुलांचे संरक्षण करणे, हे प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.
‘सांस’ मोहिमेचा हेतू केवळ उपचारापुरता मर्यादित नसून न्यूमोनियाबाबत समाजात शाश्वत जागरूकता निर्माण करणे, धोका ओळखणे आणि वेळेवर कृती करणे हा आहे. योग्य वेळी निदान व उपचार मिळाल्यास न्यूमोनियामुळे होणारा एकही बालमृत्यू टाळता येऊ शकतो, हीच या मोहिमेची प्रेरणा आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. घरी भेट देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून मुलांची तपासणी करून घ्यावी. तसेच परिसरात या मोहिमेबाबत जागरूकता वाढवावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.


