मुख्य बातमीराजकारण

आता एकमेकांची उणीदुणी काढणे बंद करा : सरचिटणीस रमेश कीर

रत्नागिरी : “कॉंग्रेस पक्षाची विचारधारा आहे तीच आहे, मात्र कार्यपध्दतीत बदल झाला आहे. आता उणीदुणी बंद करा, मी पक्षासाठी काय केलं, याचा विचार करा. यापुढे जिल्ह्यात विधानसभानिहाय कार्यकर्ता शिबिर घेऊन पक्षाला बळकटी दिली जाईल,” असे प्रतिपादन कॉंग्रेसचे सरचिटणीस रमेश कीर यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा काल (६ ऑगस्ट) कॉंग्रेस भवन येथे पार पडला. यावेळी सरचिटणीस रमेश कीर, माजी आमदार हुस्नबानु खलिफे, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, महिला जिल्हाध्यक्ष विभावरी जाधव, जिल्हा समन्वयक सुरेश कातकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रमेश कीर यांनी पक्षसंघटना वाढीसाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मी आता सर्वांना हात जोडून विनंती करतो, मागे काय झालं यावर न बोलता भविष्यात आपल्याला काय करायचं आहे, याचा विचार सर्वांनी करा. विधानसभानिहाय बीएलए आणि बुथप्रमुख यांच्या नियुक्त्या दोन महिन्यांच्या आत झाल्या पाहिजेत. यासाठी जिल्हाध्यक्षांनी समन्वयाने कामाला सुरूवात केली पाहिजे.

यावेळी कॉंग्रेसच्या सरचिटणीस माजी आमदार हुस्नबानु खलिफे यांनी सांगितले की, आता कॉंग्रेसची धुरा महिलांच्या हातीदेखील आली आहे. कॉंग्रेस पक्ष हा कधीच संपणार नाही. येणारे दिवस हे आपलेच आहेत. कॉंग्रेसची सत्ता घालवण्यासाठी भाजपला ७० वर्षे वाट पहावी लागली. त्यामुळे भाजपचे हे सरकार किती काळ टिकेल? यावर प्रश्‍न उपस्थित केला. देशासह राज्यात पुन्हा कॉंग्रेसची सत्ता येईल, असा विश्‍वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

कॉंग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद आणि सोनललक्ष्मी घाग यांचा कॉंग्रेसच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचेदेखील सत्कार या कार्यक्रमात करण्यात आले. दोन्ही जिल्हाध्यक्षांनी पक्षवाढीचे आश्‍वासन देत लवकरच जिल्ह्यात बदल झालेला पहायला मिळेल, असा शब्द यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!