कशेडी बोगदा ते चिपळूणदरम्यान वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून निवेदन

खेड : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) वतीने मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ वरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर खेड पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. कशेडी बोगदा ते चिपळूण दरम्यान महामार्गावर अवजड वाहने मोठ्या प्रमाणात उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याची बाब निवेदनातून मांडण्यात आली.
तसेच भरणे नाका येथील पुलाखाली अवैध पार्किंग करण्यात येत असल्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. या समस्येवर तातडीने कारवाई करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी खेडचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्यांक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहिम सहिबोल, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, विजय गुप्ता आणि ओवैस चौगुले उपस्थित होते.


