मिठगवाणे चिरेखाण स्टॉपजवळ टेम्पोचा भीषण अपघात
सात महिला गंभीर जखमी, एकाचा मृत्यू

राजापूर : तालुक्यातील मिठगवाणे येथील सागरी महामार्गावर आज (१३ ऑगस्ट) सकाळी ९.१५ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एक महिलेचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाघ्रण येथून बागकामासाठी जानशी पठार दिशेने निघालेल्या महिलांचा टेम्पो समोरून जात असलेल्या लक्झरी बसला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने सुमारे १०० ते १५० फूट रस्त्याच्या कडेला पलटी मारत फरफटत गेला
टेम्पोतील सर्व महिला व एक छोटी मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातात टेम्पोचालक आणि केबिनमध्ये असलेले इतर पुरुष प्रवासीही जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे पथक पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली १५-२० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील अनेकांनी जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली.



