रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राची कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठींना श्रद्धांजली

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी त्यांच्या पत्नी बदामीदेवी त्रिपाठी, कुलगुरू यांचे वाहनचालक वैभव मिश्रा यांना भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शोक संवेदना व्यक्त केल्या.
दिवंगत कुलगुरू प्रो. त्रिपाठी यांच्यासारखे संस्कृत विद्वान अकाली निघून जाणे ही संस्कृत क्षेत्राची अपरिमित हानी आहे. रत्नागिरीत देखील उपकेंद्राच्या वतीने दोनदा आयोजित केलेल्या अध्यापक विकास प्रशिक्षण कार्यशाळेला आणि क्षेत्रीय वैदिक संमेलनाला त्यांची उपस्थिती लाभली होती. शिवाय कोकणात गुरुकुल व वेद प्रसार वाढवण्याचा त्यांचा मानस होता. विश्वविद्यालयाच्या विकासाबरोबर उपकेंद्राचा विस्तार करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. यापुढे उपकेंद्राला नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नरत आणि कार्यरत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशीच भावना सर्व उपस्थितांची होती.
यावेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक, सर्व विद्यार्थी उपकेंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.



