म्हसळा नगरपंचायत हद्दीतील तीनही विसर्जन घाट दुर्लक्षित
मुंबईकर म्हसळावासीयांची प्रचंड नाराजी

म्हसळा (जि. रायगड, संजय खांबेटे) : दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करायला निघालेल्या म्हसळातील कोकणवासीयांनी शहरातील तीनही विसर्जन घाटांवरील नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आणि मुलभूत सोयीच्या अभाव याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली.

तालुक्यात दीड दिवसाचे ५१५, तर शहरातील ३१५ गणपतींचे विसर्जन झाले. म्हसळा नगरपंचायत हद्दीत हिंगूळडोह, हिंदू स्मशान भूमी, आणि खारगाव, सकलप बंदरा वरील घाट असे तीन विर्सजन घाट आहेत. शहरातील सकलप बंदरावरील घाटावर जाणारा मार्ग प्रचंड धोकादायक बनला आहे. जानसई नदी पात्रांतील हिंगूळ डोह परिसरात जानसई विकास पात्र सुशोभीकरण नावाखाली नगरपंचायतीने ९ कोटींच्या कामापैकी तब्बल २ कोटी खर्च करूनही विसर्जन घाट पूर्णपणे नादुरुस्त आहे. हिंदू स्मशान भूमी सावर नदीवरील घाट पूर्णपणे दुर्लक्षित असून, येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. चालण्यासही आयोग्य असलेल्या या ठिकाणाबाबत नगर पंचायतीच्या दुर्लक्षित कारभारावर या सर्वच समाजातील मंडळी प्रचंड नाराज झाली. समाज माध्यमावरही फोटो टाकून नगरपंचायतीच्या या गलिच्छ कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली.

दरम्यान, सकलप बंदरावरील घाटावर नारळी पौर्णिमेला महसूल, पोलीस, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रत्यक्ष जाऊनही २० दिवसांनंतरही तीच परिस्थिती हेतूपुरस्कर ठेवली होती, अशी तक्रारही झाली आहे. नगरपंचायतीने आपला साठविलेला कचरा लेनडोहामार्फत हेतुपुरस्कर जानसई नदीपात्र व नंतर खाडीला सोडत असल्यामुळे थेट नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई होणे जरुरी असल्याचे शिवसेनेचे विशाल सायकर, मनसेचे श्री. गोरेगावकर यांचे म्हणणे आहे. गेले वर्षभर कचरा डेपोमुळे दुर्गंधी, प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास हा विषय त्यानी लावून धरला आहे.




