महाराष्ट्रमुख्य बातमी

‘अंग्रेजों के जमाने का जेलर’ काळाच्या पडद्याआड

प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचं निधन

मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन झाले आहे. हिंदी सिनेसृष्टीत एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्याचा नावलौकिक होता.

आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसेच इतर भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या काही भूमिका तर आजदेखील अजरामर आणि कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. त्यांच्या जाण्याने सिनेजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोवर्धन असरानी यांचे २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता निधन झाले. दीर्घकाळापासून ते एका आजारावर उपचार घेत होते. शरीराने उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते मूळचे राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी होते. गेल्या अनेक वर्षांपासून असरानी यांची सर्व कामे त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा हेच पाहायचे. त्यांनीच असरानी यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना आरोग्य निधी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार होता, असे बाबूभाई थिबा यांनी सांगितले आहे.

त्यांनी आपले जयपूरमधील शिक्षण सेंट झेवियर्स येथून घेतले होते. असरानी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांत काम केले; परंतु त्यांनी साकारलेल्या काही विनोदी भूमिका मात्र लोकांच्या आजही स्मरणात आहेत. शोले चित्रपटात त्यांनी साकारेलल्या जेलरच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते.

गोवर्धन असरानी यांनी अनेक चित्रपटांत काम केलेले आहे. १९६७ साली त्यांचा गुजराती भाषेतला एक चित्रपट आला होता. त्यांच्या करिअरमधील हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर हरे कांच की गुडीया हा चित्रपट आला. त्यांनी नमक हराम (१९७३) या चित्रपटात केलेल्या भूमिकेचे फारच कौतुक झाले. त्यानंतर मात्र त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. पुढे कोशीश (1972), बावर्ची (1972), परिचय (1972), अभिमान (1973), मेहबुबा (1976), पलकोंकी छाव मे (1977), दो लडके दोनो कडके (1979), बंदीश (1980) यासारख्या चित्रपटांत काम केले.

असरानी यांनी जो जीता वही सिकंदर (1992), गर्दीश (1993), घरवाली बहरवाली (1995) बडे मियाँ छोटे मियाँ (1998) सारख्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या. त्यानंतर हेरा फेरी (2000), हलचल (2004), गरम मसाला (2005), चुप चुप के (200), भागम भाग (2006), दे दना दान (2009), बोल बच्चन (2012) यासारख्या अलिकडच्या चित्रपटांतही काम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!