बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प अभियानानिमित्त विविध उपक्रम

रत्नागिरी : महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत १५ ऑक्टोबर २०२५ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प’ अभियान राबविण्यात येत आहे. १८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या उपस्थितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सागर पाटील, गटविकास अधिकारी चेतन शेळके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर आदींनी बालविवाह न करण्याची प्रतिज्ञा घेतली.
बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांची जबाबदारी व कार्ये सांगण्यात आली. जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करणेकरिता सर्वांनी कटिबद्ध रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बालविवाह मुक्त महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून जिल्ह्यातील बालविवाह पूर्णपणे थांबविणे यासाठी कठोर कार्यवाही करणे, गावोगावी व्यापक जनजागृती करणे, बाल विवाहाचे पोस्टर / बॅनर लावणे, ग्रामस्तरावर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्या कार्यशाळा घेणे आदी उपक्रम घेण्यात येत आहेत.
या अभियानाचा उद्देश सर्व शासकीय विभाग, धार्मिक नेते, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांना एकत्र आणून बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ व सुधारित मार्गदर्शिका २०२२ ची अंमलबजावणी करून जिल्हा बालविवाह मुक्त करणे हा आहे.


