मोकळ्या पॅसेजमध्ये झोपल्याच्या रागातून राम आळीत तरुणावर जीवघेणा हल्ला

रत्नागिरी : शहरातील एका बँकेबाहेर फुटपाथवर झोपलेल्या फिरस्त्या व्यक्तीवर बँकेच्या सुरक्षारक्षकाने स्टीलच्या रॉडने निर्दयीपणे जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मंगेश यशवंतराव भारती (तोणदे) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील राम आळीतील जनता बँकेबाहेर असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये मंगेश भारती शनिवारी रात्री झोपले होते. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बँकेचा सुरक्षारक्षक स्वप्नील पाटील (वायंगणी) कर्तव्यावर असताना त्याने भारती यांना तिथून उठून जाण्यास सांगितले; मात्र ते उठण्यास तयार नसल्याने त्यांच्यात वाद झाला.

संतापलेल्या वॉचमनने जवळच असलेला दगड उचलून मंगेश भारतीवर यांच्या डोक्यात घातला. हा हल्ला इतका भीषण होता की संबंधित मंगेश यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार पाहताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
या घटनेची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी झाली आणि मुख्य बाजारपेठेतील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जखमी मंगेश भारती यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. या कारवाईत केदार वायचळ (सहाय्यक पोलीस निरीक्षक), सागर वाळुंजकर (पोलीस उप निरीक्षक), भगवान पाटील (पोलीस उप निरीक्षक), वैभव नार्वेकर व राकेश बागुल (पोलीस हवालदार) हे घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पंचनामा करून संशयित सुरक्षा रक्षक स्वप्नील पाटील याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, केवळ झोपल्याच्या कारणावरून एखाद्या व्यक्तीवर असा जीवघेणा हल्ला होणे याबद्दल शहरात संताप व्यक्त होत असून, भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


