विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी निपुण भारत आवश्यक : केंद्रप्रमुख गोविंद तारवे

पाली : “निपुण भारत अंतर्गत अध्ययन स्तर, वाचन, लेखन, संख्याज्ञान व प्रत्येक इयत्तेच्या अध्ययन स्तरानुसार विद्यार्थी प्रगत होतील. यासाठी शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निपुण महाराष्ट्र कृती आराखड्यामध्ये इयत्ता दुसरी ते पाचवीतील १०० टक्के विद्यार्थी संख्या आवश्यक आहे,” असे प्रतिपादन खानू केंद्रप्रमुख गोविंद तारवे यांनी केले.
जिल्हा परिषद सरस्वती विद्या मंदिर खानू क्र.१ येथे खानू केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली. यावेळी जिल्हा समन्वयक राहुल मिसाळ, खानू केंद्र मुख्याध्यापिका स्मिता जाधव, शिक्षक मनोजकुमार खानविलकर, दत्तात्रय दर्डी, लवेश गोरे, विजय पर्वते उपस्थित होते. तसेच केंद्राच्या अखत्यारीतील ८ जि.प. शाळा व माध्यमिक विद्यालय यांचे शिक्षक यावेळी उपस्थित होते.
यंदाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षकांना अध्यापनासाठी नवीन उभारी मिळावी तसेच मार्गदर्शन व्हावे त्याचबरोबर शासनाची नवीन धोरणे अवगत व्हावी. तसेच निपुण भारत अंतर्गत शाळांची सद्यस्थिती काय आहे व त्या दृष्टीने कशी तयारी करावयाची आहे त्याचा विचार विनिमय करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिक्षक संजय शेलार यांनी खानू क्र.१ शाळेतील मुलांसमवेत परिपाठ करून घेतला.
शिक्षण परिषदेत जिल्हा समन्वयक राहुल मिसाळ यांनी सीआरजी गट व शाळा व्यवस्थापन समिती याविषयी माहिती दिली. त्यानंतर नवीन अभ्यासक्रम पायाभूत जीवन कौशल्य विकास याविषयी शिक्षिका स्नेहा ठाकरे यांनी तर इयत्ता पहिलीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत शिक्षक राजाराम खाकम यांनी मराठीविषयी, शिक्षिका शामल आग्रे यांनी गणितविषयी व शिक्षक विजय पर्वते यांनी इंग्रजीविषयी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.


