प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्याचे युवकांना आवाहन

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर (बीई. बी. टेकसह) शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी नामांकीत कंपन्यामध्ये कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या इंटर्नशिप योजनेसाठी १८ ते २५ वयोगटातील पूर्णवेळ शिक्षण, कौशल्य किंवा नोकरीत नसलेला भारतीय युवावर्ग पात्र आहे.
या योजनेअंतर्गत भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये युवकांना ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. याचबरोबर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि सुरक्षा विमा योजनेचे संरक्षण दिले जाणार आहे. तसेच यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्यासाठी http://pminternship.mca.gov.in या वेबसाईटवरील रजिस्टर लॉगीन/ रजिस्टर या टॅब वर क्लिक करून उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी उमेदवारांच्या आधार क्रमांकास मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक असून आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येतो त्यानंतरच उमेदवारांची नोंदणी होऊ शकते. जिल्ह्यातील १८ ते २५ वयोगटातील जास्तीत पात्र युवक-युवतींनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत नोंदणी करून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त श्री. मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था आवार, नाचणे रोड यांच्याशी संपर्क साधावा.



