मुख्य बातमी

रत्नागिरी आरटीओतर्फे दुचाकींच्या नवीन ‘बीएम’ मालिकेचा शुभारंभ

रत्नागिरी : रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) दुचाकी वाहनांसाठी एमएच-०८-बीएम ही नवीन मालिका १२ मेपासून सुरू करण्यात येत आहे. या नवीन मालिकेतील आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी वाहनधारकांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

गर्दी टाळण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी आरटीओ प्रशासनाने सविस्तर वेळापत्रक आणि नियम जाहीर केले आहेत.

अर्ज प्रक्रिया आणि वेळापत्रक : १२ मे (सकाळी ११ ते दुपारी २): चारचाकी, परिवहन वाहने आणि ज्यांना दुचाकीच्या पसंतीच्या क्रमांकासाठी तीनपट शुल्क भरायचे आहे, अशा अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

१२ मे (सायंकाळी ४:३०): जर एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले असतील, तर सीलबंद पाकिटात जास्त रकमेचा ‘डीडी’ सादर करणाऱ्या अर्जदाराला तो क्रमांक वितरित केला जाईल.

१३ मे : दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक क्रमांकांसाठी याच पद्धतीने सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत अर्ज स्वीकारले जातील.

महत्वाचे नियम आणि अटी :

आवश्यक कागदपत्रे : अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, पॅनकार्डची साक्षांकित प्रत आणि विहित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) जोडणे अनिवार्य आहे.

डीडी कोणाच्या नावे असावा: डिमांड ड्राफ्ट ‘DY RTO RATNAGIRI’ यांच्या नावे आणि रत्नागिरी येथील नॅशनलाईज्ड किंवा शेड्यूल्ड बँकेचा असावा.

एकदा आरक्षित केलेला क्रमांक बदलता येणार नाही. तसेच, नोंदणी क्रमांक राखून ठेवल्यापासून १८० दिवसांच्या आत वाहन सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा तो क्रमांक रद्द होईल आणि भरलेले शुल्क सरकारी जमा केले जाईल. पसंतीचा क्रमांक मिळवण्यासाठी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही किंवा त्याचे समायोजन केले जाणार नाही. आरटीओ कार्यालयाने वाहनधारकांना आवाहन केले आहे की, इच्छुकांनी विहित वेळेत आणि सर्व कागदपत्रांसह हजर राहून या सुविधेचा लाभ घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!