रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्यमंत्री समृद्ध अभियान अंतर्गत १८ गावांची तपासणी सुरू

रत्नागिरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील १८ गावांची तपासणी सातारा जिल्हा परिषदेची जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती करणार आहे.
लांजा तालुक्यातील पुनस, कुरणे, वंदन, मंडणगड तालुक्यातील तोंडली, अडखळ, चिपळूण तालुक्यातील कुशिवडे, कोंडमळा, रत्नागिरी तालुक्यातील वाळके, धामणसे, संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, ओझर्डे खुर्द, दापोली तालुक्यातील आसूद व तलासुरे, खेड तालुक्यातील वरवली, देवघर, राजापूर तालुक्यातील कळसवली, खरवते अशा १८ गावांची सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीमार्फत तपासणी केली जाणार आहे. समितीचे जिल्ह्यात आगमन झाले असून समितीने निवडक गावांची तेपासणी सुरू केली आहे.

समिती समिती सुशासन मुक्त पंचायत, सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण गाव, पातळीवरील संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास, गृहनिर्माण सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यासह विविध उपक्रमांची पाहणी करणार आहे. प्रमुख आठ मुद्द्यानुसार ही समिती गावाची पाहणी करून त्यानुसार गुणांकन करणार आहे.
तालुकास्तरावरील अत्युत्कृष्ट प्रथम २ ग्रामपंचायतींचे जिल्हास्तरीय समितीमार्फत मुल्यमापन करून, सर्वाधिक गुण प्राप्त ३ ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरील अत्युत्कृष्ट प्रथम २ ग्रामपंचायतींचे विभागस्तरीय समितीमार्फत मुल्यमापन करून, सर्वाधिक गुण प्राप्त ३ ग्रामपंचायतींची विभागस्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात येईल. विभागस्तरावरील अत्युत्कृष्ट प्रथम २ ग्रामपंचायतींचे राज्यस्तरीय समितीमार्फत मुल्यमापन करून, सर्वाधिक गुण प्राप्त ३ ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात येईल. दरम्यान समितीचे स्वागत मुख्य रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बालाजी पोशेट्टी यांनी केले.
समितीकडून जिल्ह्यातील गावांचे कौतुक
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने गावांचे मूल्यमापन करण्यासाठी सातारा जिल्हातील सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक अंकुश मोटे, पत्रकार प्रवीण शिंगटे, पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा तज्ञ अजय राऊत, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संदीप दीक्षित, जयवंत ढाणे, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश कळस्कर, प्रसाद सावंत यांच्या तपासणी समितीमध्ये समावेश आहे.



