
रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे कोयत्याने सपासप वार करून सूरज राजाराम झोरे (२५, मूळ रा. नायरी संगमेश्वर, सध्या रा. विरार मुंबई) या तरुणाचा अज्ञात कारणातून खून झाला आहे. ही घटना गुरुवार (२१ मे) रोजी रात्री ९.३० ते १०.५३ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड,नजीबूल शेख उर्फ सोनू (तिघांचाही पत्ता माहिती नाही)
या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
याबाबत सूरज झोरेची बहिण नंदा रमेश फाले (३२, रा. राजेंद्र कॉम्प्लेक्स, तिरुपती बिल्डिंग दहिसर, मुंबई) हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांचा भाऊ सूरज हा काही कामानिमित्त रत्नागिरी येथे आला होता. २१ मे रोजी रात्री ९.३० ते १०.५३ वाजण्याच्या कालावधी साईनगर सात बंगल्याच्या मागे संशयित तिघांनी मिळून सूरजवर कोयत्याने मानेवर, हातांवर वार करून त्याला जिवे ठारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले होते.
सूरजवर जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज (२२ मे) रोजी दु २.३० वाजण्याच्या सुमारास सुरजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे करत आहेत.



