मुख्य बातमी

भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पाच राष्ट्रीय उपक्रमांचा शुभारंभ

'द आर्ट ऑफ लिविंग'ला ४५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल टपाल तिकिटाचे अनावरण

बेंगळुरू : ‘द आर्ट ऑफ लिविंग’ संस्थेच्या मानवतावादी सेवेला ४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त, त्यांनी शांतता, मानवी मूल्ये आणि मानवी कल्याणासाठी आयुष्यभर दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून आज भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘द आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटर’ येथे युवक विकास, उद्योजकता, शाश्वतता, चेतना अभ्यास (कॉन्शसनेस स्टडीज) आणि शिक्षण या क्षेत्रांशी संबंधित पाच मोठ्या राष्ट्रीय उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी उपराष्ट्रपतींनी इतर मान्यवरांच्या उपस्थितीत, व्यक्तींचे कल्याण, सामाजिक परिवर्तन आणि जागतिक शांततेसाठी द आर्ट ऑफ लिविंगने केलेल्या ४५ वर्षांच्या योगदानाच्या स्मरणार्थ एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण केले.

सुरू केलेल्या उपक्रमांमध्ये ‘युथ करिअर एक्सलन्स प्रोग्राम’, ‘फॅकल्टी ऑफ इस्टर्न नॉलेज सिस्टिम्स’, ‘आर्ट ऑफ लिविंग इनोव्हेशन अँड आंत्रप्रिन्युअरशिप इनक्युबेशन’, ‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन कॉन्शसनेस स्टडीज अँड ह्युमन पोटेंशियल’ आणि ‘इको शांती’ यांचा समावेश आहे. शिक्षण, नाविन्यता, पर्यावरण शाश्वतता आणि मानवी विकास या क्षेत्रांवर संस्थेचा वाढता भर या उपक्रमांमधून दिसून येतो.

द आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटर येथे महिनाभर चाललेल्या भव्य सोहळ्याची सांगता या उद्घाटन समारंभाने झाली. या सोहळ्याला भारत आणि जगभरातील ६७८ प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित होते, ज्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे राष्ट्रीय नेते, व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज, क्रीडापटू, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, धर्मगुरू, राजदूत, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

उपस्थितांना संबोधित करताना माननीय उपराष्ट्रपतींनी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी सुरू केलेल्या या चळवळीच्या विलक्षण जागतिक व्याप्तीचे कौतुक केले.

“आजचा हा सोहळा अशा एका महान संकल्पनेचा उत्सव आहे ज्याने जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. ‘द आर्ट ऑफ लिविंग’चे कार्य १८२ देशांमध्ये सुरू आहे हे जाणून मला आश्चर्य वाटले. या चळवळीच्या माध्यमातून मानवी संस्कृतीचे संपूर्ण जग परस्परांशी जोडले जात आहे,” असे उपराष्ट्रपती म्हणाले.

संस्थेच्या प्रवासाचे वर्णन करताना ते पुढे म्हणाले, “४५ वर्षांपूर्वी एका साध्या पण सखोल विचाराने या चळवळीची सुरुवात झाली होती: तो विचार म्हणजे ‘अंतर्गत शांतता हाच बाह्य समन्वयाचा पाया आहे’. संघर्ष आणि अनिश्चिततेने भरलेल्या आजच्या जगात, गुरुदेव श्री श्री रविशंकर हे ज्ञान, जागरूकता, शांतता आणि सौहार्दाच्या मूल्यांनी मानवतेला सातत्याने प्रेरित करत आहेत.”

गुरुदेवांच्या साधेपणाची आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करताना श्री राधाकृष्णन म्हणाले, “त्यांचे हास्य, त्यांची नम्रता आणि त्यांचे प्रेम प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते. त्यांनी अंगीकारलेली नम्रता आणि मानवता हेच त्यांच्या योगदानाला अद्वितीय बनवते.”

उपराष्ट्रपतींचे स्वागत करताना गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरिक विकासाच्या चिरंतन महत्त्वावर भर दिला.

“आजच्या जगाने हे मान्य केले आहे की ध्यान ही आता केवळ चैनीची गोष्ट राहिलेली नाही. १९२ देशांनी एकत्रित येऊन ‘जागतिक ध्यान दिन’ घोषित केला आहे, यावरून हे स्पष्ट होते की निरोगी, आनंदी आणि तणावमुक्त जीवनासाठी ध्यान ही एक मूलभूत गरज आहे,” असे गुरुदेव म्हणाले.

मानवी विकासाच्या सर्वांगीण दृष्टिकोनाचे आवाहन करताना ते पुढे म्हणाले, “जीवनाच्या प्रवासात तीन गोष्टी नेहमी आपल्यासोबत असणे आवश्यक आहे: ज्ञान, ध्यान आणि संगीत.”

जागतिक सौहार्दाचा संदेश देत गुरुदेवांनी समारोप केला, “चला आपण सर्वजण मिळून ‘वसुधैव कुटुंबकम्’चे स्वप्न पाहूया — एक असे जागतिक कुटुंब जे भीती, तणाव आणि द्वेषापासून मुक्त असेल. शांततापूर्ण आणि सुसंवादी जगाची सुरुवात ही शांतताप्रिय आणि सुसंवादी व्यक्तींपासूनच होते.”

कर्नाटकचे माननीय राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनीही उपस्थितांना संबोधित केले आणि या जागतिक चळवळीच्या उगमस्थानाचा कर्नाटकशी असलेला गडद संबंध अधोरेखित केला.

“कर्नाटकसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की या जागतिक चळवळीची पाळेमुळे आपल्या पवित्र भूमीशी जोडलेली आहेत. चार दशकांहून अधिक काळापासून, द आर्ट ऑफ लिविंग विविध उपक्रमांच्या माध्यमातून वैयक्तिक, सामाजिक आणि जागतिक पातळीवर शांतता आणि कल्याणाचा प्रसार करत आहे,” असे ते म्हणाले.

शांतता प्रस्थापित करण्यासाठी गुरुदेवांनी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत राज्यपाल पुढे म्हणाले, “मानवतावादी सेवेपलीकडे, गुरुदेवांच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांनी दीर्घकालीन संघर्ष सोडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मानवी मूल्यांच्या पुनरुज्जीवनातून हिंसामुक्त आणि तणावमुक्त समाज घडवण्याच्या त्यांच्या संकल्पनेचे जगभरात कौतुक आणि गौरव झाला आहे.”

आश्रम भेटीदरम्यान उपराष्ट्रपतींनी संस्थेच्या विविध सुविधा आणि उपक्रमांची पाहणी केली. त्यांनी ‘श्री श्री गुरुकुलम’ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, ‘प्रताप गणपती मंदिरा’त प्रार्थना केली, ‘श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगा’च्या पवित्र अवशेषांचे दर्शन घेतले आणि सुमारे १,६०० देशी गायींचे निवासस्थान असलेल्या ‘श्री श्री गोशाळे’ला भेट दिली.

या भेटीचे एक विशेष आकर्षण म्हणजे द आर्ट ऑफ लिविंगच्या ‘इंट्युइशन प्रोग्राम’च्या (Intuition Program) साधकांनी केलेले सादरीकरण होते, ज्यामध्ये मुलांनी पद्धतशीर प्रशिक्षण आणि सरावातून विकसित केलेल्या आपल्या अंतर्ज्ञान क्षमतेचे (Intuitive abilities) प्रदर्शन केले.

सेवा, संस्कृती आणि मानवी मूल्यांचा महिनाभर चाललेला उत्सव

जवळपास महिनाभर, द आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटरने ‘वसुधैव कुटुंबकम् — एक जागतिक कुटुंब’ या भावनेचे दर्शन घडवत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील लोकांचे स्वागत केले.

या उत्सवात सहभागी झालेल्या मान्यवरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सर्बानंद सोनोवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एन. चंद्राबाबू नायडू आणि प्रमोद सावंत, राज्यपाल अजय कुमार भल्ला आणि लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग, दिग्गज अभिनेते रजनीकांत यांच्यासह प्रमुख धर्मगुरू, कलाकार, मुत्सद्दी आणि विचारवंतांचा समावेश होता.

बेंगळुरूमधील या भव्य सोहळ्यात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला, जिथे विविध क्षेत्रातील लोक आणि नामवंत व्यक्ती या निमित्ताने एकत्र आल्या होत्या. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि निरंजन हिरानंदानी, तसेच जॅकी श्रॉफ, राजकुमार हिराणी, साजिद नाडियाडवाला, भूमी पेडणेकर, लारा दत्ता आणि विक्रांत मॅसी – बेंगळुरूमध्ये अनेक दिग्गज व्यक्तींची मांदियाळी पाहायला मिळाली. यातील प्रत्येक जण अत्यंत प्रभावित होऊन आणि आदराची व कृतज्ञतेची सखोल भावना घेऊन परतला.

या महिनाभराच्या उत्सवात नव्याने उद्घाटन झालेल्या ‘ध्यान मंदिरा’त जागतिक ध्यान सत्रे, भारताच्या कलात्मक वारशाचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मानसिक आरोग्य आणि चेतनेवर चर्चा आणि गेल्या साडेचार दशकांत गुरुदेवांच्या कार्याने ज्यांचे जीवन बदलून गेले अशा व्यक्तींच्या परिवर्तनाच्या कथा सादर करण्यात आल्या.

मुख्यत्वे, हा सोहळा म्हणजे गुरुदेवांच्या आंतरिक शांतता, सेवा आणि मानवी मूल्यांवर आधारित तणावमुक्त, हिंसामुक्त समाज घडवण्याच्या चिरंतन संकल्पनेचा पुनरुच्चार होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!