रत्नागिरी पोलीस दलाची गड-किल्ले स्वच्छता, संवर्धन व वारसा जतन विशेष मोहीम

रत्नागिरी : जिल्ह्यात असलेल्या ऐतिहासिक गड-किल्ले वास्तूंचे व अमूल्य वारशाचे जतन, संवर्धन व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक, रत्नागिरी नितीन दत्तात्रय बगाटे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना या आठवड्यात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या साक्षीदार असलेले तसेच महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील गड-किल्ले हे आपल्या सांस्कृतिक अस्मितेचे आणि ऐतिहासिक गौरवाचे जिवंत स्मारक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले अनेक गड-किल्ले असून हे किल्ले आपल्या समृद्ध इतिहासाचे व सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहेत.
या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक गड-किल्ले व त्यांच्या परिसरामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असून मोहिमे अंतर्गत स्वच्छता करण्यात येणार असून प्लास्टिक, कचरा व इतर प्रदूषणकारी वस्तूंचे निर्मूलन आणि पर्यावरण संवर्धन करण्यात येणार आहे.
तसेच स्थानिक नागरिक, युवक, स्वयंसेवी व सेवाभावी संस्था, विद्यार्थी, ग्रामस्थ व इतिहासप्रेमी यांचा सहभाग घेऊन ऐतिहासिक वारसा जतनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
रत्नागिरी पोलिसांचा हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून ऐतिहासिक वारशाबद्दल समाजात अभिमान निर्माण करणे, पर्यावरण संरक्षणाला चालना देणे आणि भावी पिढ्यांसाठी गड-किल्ल्यांचे जतन करण्याचा एक प्रयत्न असणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दुर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, युवक व सामाजिक संस्थां यांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.



