जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र पावस येथे जनजागृती कार्यक्रम उत्साहात

रत्नागिरी : जिल्ह्यात जागतिक लोकसंख्या दिन (११ जुलै) तसेच लोकसंख्या स्थिरता सप्ताह विविध जनजागृती उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र पावस येथे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण, कुटुंब नियोजन आणि माता-बाल आरोग्याबाबत विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य ॲड. महेंद्र मांडवकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरण काठोळे, जिल्हा माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे व डॉ. अतुल पाटील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व विशद करताना वाढत्या लोकसंख्येचे सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक परिणाम स्पष्ट केले.”दोन जन्मातील आंतर, कुटुंब सदृढ निरंतर “या घोषवाक्याचे महत्व विषद करून त्यांनी लोकसंख्या स्थिरीकरणासाठी कुटुंब नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करत शासनामार्फत उपलब्ध असलेल्या विविध कुटुंब नियोजन साधने व सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नियोजित कुटुंबामुळे माता व बालकांचे आरोग्य अधिक सुदृढ राहण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थी महिलांचा ॲड. महेंद्र मांडवकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात ॲड. मांडवकर यांनी कुटुंब नियोजनामध्ये महिलांचे योगदान मोलाचे असले तरी पुरुषांनीही पुढाकार घेऊन पुरुष नसबंदीबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन केले. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकाने घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष कांबळे यांनी केले. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन सेवा, माता-बाल आरोग्य कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार डॉ. अतुल पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमास पावस गावातील महिला, पुरुष तसेच विविध स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकसंख्या स्थिरता, आरोग्यदायी कुटुंब आणि सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांना नागरिकांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



