मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर व टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत एक्स-रे तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पावस व उपकेंद्र डोर्ले यांच्या वतीने १५ जुलै रोजी ग्रामपंचायत डोर्ले, कुडवाडी, दाभीळ व आंबेरे येथे ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर तसेच ‘टी.बी. मुक्त भारत अभियान–२०२६’ अंतर्गत विशेष छाती (Chest X-Ray) तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव अभियान’, मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर तसेच ‘टी.बी. मुक्त भारत अभियान–२०२६’ प्रभावीपणे राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
टी.बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत आयोजित एक्स-रे तपासणी शिबिरामध्ये एकूण १४२ नागरिकांची छातीची (Chest X-Ray) तपासणी करण्यात आली. क्षयरोगाचे लवकर निदान होऊन बाधित रुग्णांवर वेळेत उपचार सुरू करता यावेत, या उद्देशाने ही तपासणी करण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
तसेच ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव अभियान’ अंतर्गत आयोजित मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, आवश्यक आरोग्य समुपदेशन तसेच विविध आजारांच्या प्रतिबंध, लवकर निदान व उपचाराबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. ग्रामीण नागरिकांना त्यांच्या गावातच तज्ज्ञ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
या शिबिरा प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटील, ग्रामपंचायत डोर्लेचे प्रशासक सचिन गिजबिले, जनआरोग्य समिती सदस्य अजय तेंडुलकर, माजी पंचायत समिती सदस्य सुशांत पाटकर, ग्रामपंचायत शिवार आंबेरेचे प्रशासक राजन रोकडे, डोर्लेचे माजी उपसरपंच सुधाकर दैत, इन्फिगो हॉस्पिटल, रत्नागिरीची तज्ज्ञ टीम, एस.टी.एस. बंदेवाड, आरोग्य सहाय्यक कोळेकर, आरोग्य सहाय्यक दराडे, आरोग्य सहाय्यिका श्रीमती कांदळगावकर तसेच सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविणे, क्षयरोगाचे वेळेत निदान करून त्यावर प्रभावी उपचार करणे, तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, नागरिकांनी अशा आरोग्य शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.


