७० वर्षांवरील ज्येष्ठांनी आयुष्मान वय वंदना कार्ड त्वरित काढावे : डॉ. अनिरुद्ध आठल्ये

रत्नागिरी : राज्यातील ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत १ एप्रिल २०२५ पासून “आयुष्मान वय वंदना” योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार १२५ ज्येष्ठ नागरिकांना आता पाच लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त मोफत उपचार (टॉप-अप) उपलब्ध होणार आहेत. ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत जिल्ह्यातील २६ हजार ६४३ ज्येष्ठ नागरिकांनी आपले आयुष्मान वय वंदना कार्ड तयार करून घेतले असून उर्वरित पात्र लाभार्थ्यांनीही लवकरात लवकर कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातात. मात्र, ज्या कुटुंबाकडे आधीच आयुष्मान कार्ड आहे, त्या कुटुंबातील ७० वर्षे व त्यावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला “आयुष्मान वय वंदना” योजनेअंतर्गत स्वतंत्र पाच लाख रुपयांचे अतिरिक्त आरोग्य संरक्षण (टॉप-अप) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिक अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र, गावातील आशा सेविका, आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र, स्थानिक राशन दुकानदार यांच्या माध्यमातून तसेच beneficiaries.nha.gov.in या संकेतस्थळावर किंवा आयुष्मान मोबाईल अॅपद्वारे मोफत आयुष्मान वय वंदना कार्ड तयार करून घेऊ शकतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ७० वर्षे व त्यावरील पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी “आयुष्मान वय वंदना” कार्ड पूर्णपणे मोफत असून उपचारांच्या वेळी मोठा आर्थिक दिलासा देणारे आहे. शासनाच्या या लोकहितकारी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकाने आपले कार्ड तातडीने तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आरोग्य सभापती विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.



