शैक्षणिक आणि शासकीय सवलतींसाठी विद्यार्थ्यांचे ‘आधार’ अपडेट करणे अनिवार्य; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शैक्षणिक सुविधा आणि पारदर्शक शासकीय सेवांचा लाभ विनाअडथळा मिळवण्यासाठी नागरिकांनी आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड वेळेवर अद्ययावत (अपडेट) ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ५ आणि १५ वर्षे पूर्ण झालेल्या बालकांचे बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य असून, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष आधार शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
लहान मुलांच्या वयानुसार त्यांच्या चेहऱ्याच्या ठेवणीत आणि बायोमेट्रिक माहितीत बदल होत असतात. बालक ५ वर्षे आणि १५ वर्षे वयाचे झाल्यानंतर आधारमधील बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे. नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा मोबाईल क्रमांक यात काही बदल किंवा चूक असल्यास योग्य कागदपत्रांद्वारे दुरुस्ती करून घ्यावी. UIDAI च्या नियमांनुसार, ओळख व पत्त्याची कागदपत्रे जुनी असल्यास आवश्यक ती नवीन कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत असल्यास त्यांना अनेक शैक्षणिक व शासकीय प्रक्रियांमध्ये मदत होते. शिष्यवृत्ती आणि विविध शैक्षणिक शिष्यवृत्त्या मिळवण्यासाठी, स्पर्धा परीक्षांसाठी आणि नव्याने लागू झालेला ‘अपार आयडी’ सहज तयार करण्यासाठी अचूक आधार माहिती उपयुक्त ठरते. शासकीय योजनांचा निधी थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी बँक खाते आधारशी अचूक जोडलेले असणे आवश्यक आहे. NEET, JEE यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेदरम्यान ओळख पडताळणी विनाअडचण पूर्ण होते.
विद्यार्थ्यांना आधार अपडेट करणे सोयीचे जावे यासाठी शाळा व महाविद्यालयांनी जवळच्या अधिकृत आधार केंद्राशी समन्वय साधून विशेष शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. शाळा व महाविद्यालयांना शिबिर आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथील संपर्क अधिकारी प्रतीक पेठकर यांच्याशी ८३५५८६८०६७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.
पालकांनी आपल्या ० ते ५ वयोगटातील मुलांची नवीन आधार नोंदणी करून घ्यावी तसेच ५ व १५ वर्षे पूर्ण झालेल्या पाल्यांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट त्वरित पूर्ण करावे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनीही जवळच्या आधार केंद्रात जाऊन आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



