मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कौंढर काळसूर येथे विविध उपक्रम

गुहागर (संदेश कदम) : खरवते (ता. चिपळूण) येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या बीएस्सी कृषीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) २०२६-२७ अंतर्गत कौंढर काळसूर गावात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.

या उपक्रमांचा एक भाग म्हणून गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, कौंढर काळसूर गुरववाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, पर्यावरणीय व कृषीविषयक विषयांवर आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कलागुण, कल्पनाशक्ती तसेच सामाजिक व पर्यावरणविषयक जाणीव वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन साहिल कटकर, यश पाटील, आदित्य औताडे, शिवम पाटील, यश माळी आणि प्रणव मदन या बीएस्सी कृषीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी केले.

कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून कौंढर काळसूर गावामध्ये शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद, कृषीविषयक मार्गदर्शन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती, विविध शासकीय योजनांबाबत जनजागृती, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. गावातील प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, शेतीव्यवस्था आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्याची संधी मिळत आहे. तसेच कृषी शिक्षणातून मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष गावपातळीवर पोहोचवून ग्रामविकासाला हातभार लावणे हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून “कृषी शिक्षणातून ग्रामविकासाकडे” या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!