मुख्य बातमी

नेपाळमध्ये महाप्रलय; १६० जणांचा मृत्यू; १००० हून अधिक जण बेपत्ता

काठमांडू : नेपाळच्या रेसुवा जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजवला आहे. बुधवारी सकाळी ‘भोटेकोशी’ नदीला आलेल्या भीषण पुरामुळे हजारो लोक वाहून गेले आणि नदीकाठची अनेक गावे व घरे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून १००० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. सध्या लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा पूर स्थानिक पातळीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे नाही, तर तिबेटमधील हिमनदीच्या सरोवराचा बांध फुटल्यामुळे आला आहे. यामुळे काही मिनिटांतच भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली. प्राथमिक अंदाजानुसार, १,००० हून अधिक लोक वाहून गेले आहेत. उत्तरगया ग्रामीण नगरपालिकेच्या उपाध्यक्षा चमेली गुरुंग यांनी सांगितले की, “स्याफ्रुबेसी, बेत्रावती, मैलुंग, सालेतार, शांती बाजार, परेबेसी, खाल्टी बस्ती, सोले, त्रिशुली आणि बत्तर या नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा सर्वांत मोठा फटका बसला असून प्रचंड जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नेपाळचे लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापन पथके बाधित भागात युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. पुराचे थरकाप उडवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लष्कराचे प्रवक्ते राजाराम बस्नेत म्हणाले, “पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी लष्कराची हेलिकॉप्टर पाठवण्यात आली. मात्र, संपूर्ण परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्यामुळे हेलिकॉप्टर खाली उतरू शकली नाहीत. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या सर्व वस्त्यांमधील रहिवाशांना त्वरित सुरक्षित आणि उंचावरील भागात स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. नेपाळच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, १०५ भारतीय नागरिकांसह २९१ परदेशी पर्यटक अद्याप बेपत्ता आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!