बेकायदा वाळू वाहतूक व विना नंबर प्लेट वाहनांवर आरटीओ चा बडगा; दीड कोटींहून अधिक दंड वसूल
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांची माहिती; वायुवेग पथकाकडून धडक तपासणी मोहीम

रत्नागिरी : जिल्ह्यातील बेकायदा वाळू वाहतूक, महसूलचे दुर्लक्ष आणि नंबर प्लेट नसलेल्या वाहनांच्या गैरवापराबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत उप प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) धडक कारवाई सुरू केली आहे. विभागाच्या ‘वायुवेग पथका’मार्फत नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या संपूर्ण वर्षभरात ४,९७२ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात ओव्हरलोड (क्षमतेपेक्षा जास्त भार) वाहतूक करणाऱ्या ३५५ वाहनांकडून तब्बल १ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
एप्रिल ते जुलै २०२६ या गेल्या चार महिन्यांत २,२७४ वाहनांची तपासणी झाली असून दोषी ठरलेल्या १९२ वाहनांकडून ३५ लाख ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या वर्षभरात विना नंबर प्लेट वाहनांवर दंडाचा बडगा उगारण्यात आला. तपासणी केलेल्या ५,८४४ वाहनांपैकी १८३ दोषी वाहनांकडून १ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत १,०७५ वाहनांची तपासणी करून दोषी आढळलेल्या १४७ वाहनांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता, सर्व वाहतूकदारांनी रस्ते व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी विभागामार्फत सातत्याने जनजागृती व प्रबोधन मोहीमही राबवण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



