एसआयआरमधील न सापडलेल्या मतदारांनी घाबरून न जाता नावाची पडताळणी करावी : विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल
कोकण विभागातील ७९ लाख न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

नवी मुंबई : विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेत कोकण विभागातील न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोकण विभागातील ७५ मतदारसंघांमध्ये एकूण २ कोटी ४७ लाख ६२ हजार मतदार असून, त्यापैकी सुमारे ७९ लाख मतदार सध्या सापडलेले नाहीत. संबंधित मतदारांची प्रारुप यादी विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या तसेच कोकण विभागाच्या संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी ही यादी तपासून आपले नाव त्यामध्ये आहे का, याची पडताळणी करावी, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त तथा एसआयआर निरीक्षक रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
कोकण विभागात एसआयआर प्रक्रियेसाठी पाच जिल्ह्यांची जबाबदारी विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे निरीक्षक म्हणून सोपविण्यात आली आहे. तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी निरीक्षक म्हणून मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एसआयआर प्रक्रियेत मतदारांच्या नावांची पडताळणी करताना ७९ लाख मतदार सध्या सापडलेले नाहीत. अशा मतदारांची नावे प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामुळे संबंधित मतदारांनी आपले नाव मतदार यादीतून वगळले गेले आहे, असा गैरसमज करून घेऊ नये. ज्या पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे, त्यांनी विहित फॉर्म क्रमांक ६ भरून संबंधित मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयात सादर करावा. हे अर्ज संबंधित मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही पूर्ण करावी.
एसआयआर प्रक्रियेदरम्यान नागरिकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी दावे व हरकती दाखल करण्यासाठी दि. ३० सप्टेंबर २०२६पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे न सापडलेल्या मतदारांनी तसेच मतदार यादीबाबत काही दुरुस्ती किंवा हरकत असल्यास संबंधितांनी विहित मुदतीत आवश्यक अर्ज सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
कोकण विभागातील सर्व नागरिकांनी एसआयआर प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहून प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप यादी तपासावी, स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबातील पात्र सदस्यांचे नाव मतदार यादीत आहे का, याची खात्री करावी आणि आवश्यकता असल्यास विहित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रशासनाकडूनही आवश्यक सहकार्य करण्यात येईल,” असेही विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.



