प्रशांत मकवाना यांचा ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्काराने गौरव
तायक्वांदो क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची राज्यस्तरावर दखल

रत्नागिरी : तायक्वांदो क्रीडा प्रकारातील उल्लेखनीय कामगिरी, सातत्यपूर्ण योगदान तसेच क्रीडा क्षेत्रातील भरीव कार्याची दखल घेत रत्नागिरीचे सुपुत्र प्रशांत मनिषा मनोज मकवाना यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार – २०२६’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रशांत मकवाना यांनी तायक्वांदोमध्ये खेळाडू म्हणून उल्लेखनीय कामगिरी करण्याबरोबरच प्रशिक्षक आणि पंच म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ते आंतरराष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू, राष्ट्रीय पंच, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय प्रशिक्षक तसेच 2nd DAN ब्लॅक बेल्ट आहेत.
तायक्वांदोच्या माध्यमातून युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मसंरक्षणाची भावना निर्माण करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्याची संधी मिळाली आहे. खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि क्रीडा क्षेत्रातील विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या पुरस्काराबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, किरण उर्फ भैय्या सामंत तसेच रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रशांत मकवाना यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष नीरज बोरसे व दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारिणी सदस्य अजित घार्गे व सतीश खेमस्कर यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव लक्ष्मण के., खजिनदार शशांक घडशी, तसेच गणराज तायक्वांदो क्लबच्या अध्यक्षा सौ. पूजा शेट्ये, उपाध्यक्षा साक्षी मयेकर, सचिव रंजना मोंडूळा, सौ. स्नेहा मोरे, परेश मोंडूळा, शलाका जावकर आणि पालकवर्ग यांनीही प्रशांत मकवाना यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रशांत मकवाना यांच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, खेळाडू, पालक तसेच रत्नागिरीकरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तायक्वांदो क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकाळच्या उल्लेखनीय योगदानाची राज्यस्तरावर झालेली ही दखल रत्नागिरीसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.



