कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

सिंधुदुर्गाचा निसर्ग आणि साहित्यिक वारसा प्रेरणा व आनंददायी : डॉ. श्रीपाद जोशी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील निसर्गसंपदा आणि साहित्यिक वारसा आनंददायी आणि प्रेरणादायी असुन त्यामुळे आपण भारावून गेल्याची भावना पुणे येथील प्रसिद्ध कवी, गीतकार व गझलकार प्रा. डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी येथील मोती तळ्याकाठी रम्य संध्याकाळी केशवसुत तुतारी स्मारकाजवळ डॉ. जोशी यांच्या उपस्थितीत गप्पा व कवितांची अनौपचारिक मैफल नुकतीच रंगली. त्यावेळी प्रा. जोशी यांनी ही भावना व्यक्त केली.

प्राचार्य विद्याधर भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित काव्यवाचन स्पर्धेच्या उद्घाटनासाठी डॉ. जोशी सावंतवाडीत आले होते. या कार्यक्रमानंतर संध्याकाळी केशवसुत स्मारकाजवळ एका अनौपचारिक कार्यक्रमाचे आयोजन ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेने केले होते. उपस्थित नागरिकांच्यासमोर प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी डॉ. जोशी यांना बोलते केले, तेव्हा त्यांनी गीतलेखनामागची प्रक्रिया सांगितली. दूरवाहिन्यांवरील अनेक मालिकांची शीर्षकगीते त्यांनी लिहिली आहेत. या शीर्षकगीतांची रचना, ध्वनिमुद्रण यावेळचे अनेक किस्से त्यांनी सांगितले.

आरती प्रभू आणि केशवसुत यांचे काव्य आपल्यासाठी प्रेरक असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कोकणी माणसाचे निसर्गावर अतोनात प्रेम आहे. या प्रेमापोटीच कोकणी माणसाने येथील निसर्ग जपला आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. त्यांच्या स्वरचित कवितेने मैफलीची सांगता झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी केले. यावेळी ‘घुंगुरकाठी’चे सतीश लळीत यांच्यासह शंकर प्रभू, प्रा. दिलीप गोडकर, श्याम भाट, प्रदीप प्रियोळकर, प्रा. रामदास निवेलकर, दत्तप्रसाद गोठोसकर, बाळकृष्ण राणे, पीटर परेरा आणि अनेक नागरिक उपस्थित होते. या आकस्मिक अनौपचारिक मैफिलीचा लाभ झाल्याने आपण सुखावलो, अशी भावना रसिक श्रोत्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!