कोकण रेल्वेच्या टीसीच्या सतर्कतेने अपहरण झालेल्या मुलाला वाचवण्यात यश

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या एका टी सी च्या सतर्कतेमुळे एका अपहरण होणाऱ्या मुलाला वाचवण्यात यश आले आहे.कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २७ सप्टेंबरच्या दादर ते सावंतवाडी या ट्रेनमध्ये कोकण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण यांना एक इसम एका लहान मुलाबरोबर आढळून आला. या इसमाचे बरोबरच्या मुलाबरोबरचे वागणे टीसी चव्हाण आणि अन्य प्रवाशांना ही संशयित वाटले. संदेश चव्हाण यांना संशय आल्याने त्यांनी त्या इसमाची चौकशी सुरू केली; पण त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. यामुळे चव्हाण यांना हे मूल त्याचे नसून त्याने पळवून आणले असल्याचा संशय अधिक बळावला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संदेश चव्हाण यांनी त्या इसमाला धरून ठेवले आणि तात्काळ चालत्या ट्रेन मधूनच नियंत्रण कक्ष वाडी बंदर लोहमार्ग मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे यांना माहिती दिली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक ताजने आणि ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलिसांनी हा संशयित इसम व त्याच्याकडील मुलाला ताब्यात घेतले. संशयित आरोपी अमोल अनंत उदलकर (वय ४२, रा. इंदील देवगड) याला मुलासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करताच त्याने हे मूल मुंबई केइम रुग्णालयातून पळवून आणल्याचे स्पष्ट झाले. या मुलाचे नाव आयुष अजयकुमार हरिजन (वय २ वर्षे) असल्याचे स्पष्ट झाले. या बाळाची आई रुग्णालयात उपचार घेत असताना आजीकडे असलेल्या या मुलाचे या इसमाने अपहरण केले होते. यानंतर या आरोपीला भुईवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कोकण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे या अपहरण झालेल्या मुलाला वाचवण्यात यश आल्याने टीसी संदेश चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोकण रेल्वेमध्ये आपले सेवा बजावताना दाखवलेल्या या सतर्कतेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनीही तात्काळ घेत संदेशचे विशेष कौतुक करत त्यांना १५ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे. संदेश चव्हाण यांना कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले आहे.



