कार्तिकी एकादशीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर देवस्थान येथे कार्तिकी एकादशी उत्सव पार पडणार आहे. विठ्ठल मंदिर, बाजारपेठ येथे होणाऱ्या या उत्सवा दरम्यान २ नोव्हेंबर रोजी रात्री १२ ते ३ नोव्हेंबर रोजी १० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची रामनाका ते गाडीतळ आणि गोखले नाका ते कॉंग्रेस भवन येथील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या वाहतुकीला आठवडा बाजार-टिळक आळी-शेरे नाका-गाडीतळ हा पर्यायी मार्ग सुरु ठेवण्यात येणार आहे.
कार्तिकी एकादशी उत्सव कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या कार्यक्रमासाठी सुमारे १० ते १२ हजार भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ व मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५, ११६(१) (अ) (ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय व मंत्री महोदय यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने, पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने यांना लागू होणार नाही. निकडीच्या व अत्यावश्यक प्रसंगी त्याठिकाणी तैनात असलेले संबंधित पोलीस अधिकारी हे निर्णय घेवू शकतील.


