सामाजिक परिवर्तन घडविणारे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत : विवेक पवार

आबलोली (संदेश कदम) : “विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत देशाच्या संविधानाचे शिल्पकार झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले म्हणून या देशाला सामाजिक आणि शैक्षणिक विकासाचा नवीन विचार दिला. विद्यार्थ्यांमधूनही डॉ. आंबेडकर यांचा विचार घेऊन सामाजिक परिवर्तन घडवणारे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत,” असे जाहीर आवाहन बौद्धजन पंचायत समितीचे विश्वस्त विवेक गोविंदराव पवार यांनी केले.
बौद्धजन पंचायत समिती मुंबई सांताक्रुज भीमवाडा पश्चिम- ५४ या धम्म संघटनेच्या संयुक्त विद्यमाने भीमवाडा येथील बुद्ध विहारात विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन (७ नोव्हेंबर १८९९) छत्रपती प्रतापसिंह भोसले हायस्कूल सातारा येथे झाला होता. हाच प्रवेश दिन बौद्धजन पंचायत समिती सांताक्रुज मुंबई भीमवाडा या धम्म संस्थेने उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला.

विवेक पवार हे पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी बालपणापासूनच डॉ. बाबासाहेबांचा विचार अंगीकारून अभ्यास करावा. शालेय जीवनात ध्येय निश्चित ठेवून डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा उच्चपदस्थानी आमची मुले गेली पाहिजेत. आई, वडिलांचे स्वप्न आणि समाजाचा विकास हाच विद्यार्थ्यांनी ध्यास घेतला पाहिजे.”
यावेळी सांताक्रुज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांचे हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १९३ या शाखेचे पदाधिकारी विजय गमरे, संदीप सोरे, शाखा क्रमांक ४३३ या शाखेचे माजी पदाधिकारी प्रभाकर गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बौद्धजन पंचायत समितीचे बौद्धाचार्य सुदेश गमरे यांनी पूजा पाठ केला. यावेळी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या साधना सुरदास, रजनी गमरे, संध्या पवार, वर्षा कदम, माधुरी गमरे, उन्नती जाधव, अनंत पवार, महेंद्र जाधव, संगम गमरे आदी उपस्थित होते.



