पोलीस भरती कालावधीत गैरप्रकारापासून सावध राहण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलातील शिपाई व पोलीस शिपाई चालक पदासाठी भरती प्रक्रिया होणार असून, या भरती प्रक्रिया कालावधीत भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांकडून तसेच बोगस दलालांकडून किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींकडून ओळखीचा गैरफायदा घेवून व तसे ओळखीचे अगर अन्य प्रकारचे आमिष दाखवून कोणी पैशाची मागणी करत असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय, लाचलुचपत विभाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.
श्री. बगाटे यांनी सांगितले की, पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान काही लोकांकडून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला जातो. पैसे देवून नोकरीला लावतो असे आमिष देखील दाखविले जाते. यातून भरतीसाठी आलेल्या उमदेवारांची फसवणूक होते. कुणाकडून गैरप्रकार होत असल्यास याबाबत तक्रार दाखल झाल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.
रत्नागिरी पोलीस दलातील अनेक गाड्या कालबाह्य झाल्या असून, पोलिसांना नवीन गाड्या उपलब्ध होण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. लवकर गाड्या उपलब्ध झाल्यास पोलिसांचे काम अधिक गतीमान होईल, असा विश्वास श्री. बगाटे यांनी यावेळी व्यक्त केले.


