ॲड. संग्राम देसाई बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत सर्वोच्च मतांनी चमकले

रत्नागिरी : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा २०२६ च्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य ॲड. संग्राम देसाई प्रचंड भरघोस मतांनी निवडून आले असून त्यांचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तरुण आणि ज्येष्ठ वकिलांनी अभिनंदन केले आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणुकीमध्ये एकूण २५ सदस्यांपैकी सहाव्या क्रमांकाने निवडून येणे ही कोकणासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.
खंडपीठ ,विविध न्यायालय निर्मिती, अॅडव्होकेट ट्रैनिंग अँड रिसर्च सेंटर व वकील वर्गासाठी घेतलेल्या हितवर्धक निर्णयाचीच पोच पावती म्हणूनच तरुणांसह ज्येष्ठ वकील वर्गामध्येही लोकप्रिय असलेले आणि सिंधुदुर्गसारख्या छोट्या बारचे प्रतिनिधित्व करूनही वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव झटणारे व्यक्तिमत्व, कोकणचा हा हिरा अॅड. संग्राम देसाई हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून सलग दुसऱ्यांदा बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवावर निवडून आलेले आहेत आणि त्यांचा हा विजय रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि कोकणच्या वकिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गौरवास्पद असाच आहे.
विजयानंतर बोलताना अॅड. देसाई यांनी माझ्या विजयात प्रत्येक वकील बांधवानी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाचा वाटा असल्याचे नमूद केले. वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या न्याय्य व हक्कासाठी कायम काम करत राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या (BCMG) अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना मात देऊन फक्त आणि फक्त आपल्या कामातूनच उत्तर देणारे आणि सर्वच स्तरातील वकील वर्गातून मते मिळवून पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण करून सहाव्या क्रमांकावर निवडून येण्याची ही कामगिरी वकील वर्तुळात प्रचंड कौतुकाचा विषय ठरत आहे. महाराष्ट्र राज्यातील तसेच गोवा राज्य, केंद्रशासित असलेले दिव, दमण दादरा-नगर हवेली तसेच जवळ जवळ सर्वच जिल्ह्यांमधील सर्वच तालुक्यात वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामांची पोचपावती म्हणूनच अॅड. देसाई यांना सहाव्या पसंतीची मते मिळाली.
अॅड. देसाई यांच्या विजयानंतर अॅड. एफ. एम. डिंगणकर, अॅड. बाबासाहेब परुळेकर, अॅड. डी. बी. भावे, अॅड. मुद्दस्सर डिंगणकर, अॅड. अशोक भिसे, अॅड. बंटी वणजू, अॅड. महेंद्र मांडवकर, अॅड. नाचणकर, अॅड. धारिया, अॅड. शबाना वस्ता, अॅड. सरोज भाटकर, अॅड. सहस्त्रबुद्धे, अॅड. शिंदे,अॅड. नीलम शेवडे, अॅड. गुण्ये यांनी आता खऱ्या अर्थाने वकिलांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारा अपल्या हक्काचा माणूस निवडून आला आहे अशी प्रतिक्रिया देतानाच संग्राम देसाई यांना भविष्यातील उज्ज्वल वाटचालीस सर्व वकील बांधवांच्या वतीने मनापासून शुभेच्छा दिल्या.
अॅड. देसाई यांच्या भरघोस आणि अभूतपूर्व विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्र, गोवा दिव दमण दादरा नगरहवेली येथील वकील वर्ग आणि विविध जिल्हा व तालुक्यातील वकील संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



