आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाचानी जहाज केले हायजॅक
रत्नागिरीतील दोन तरुणांसह दहाजण ओलीस : मुलांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची पालकांची मागणी

रत्नागिरी : आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाचानी डांबर वाहतूक करणारे जहाज हायजॅक केले असून, रत्नागिरीतील दोन तरुणांसह दहा जणांना ओलीस ठेवले आहे. अकरा दिवस उलटूनही याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने आपली मुले सुरक्षित आहेत की नाही, अशी चिंता पालकांना पडली आहे. यासंदर्भात संबंधित जहाज कंपनीच्या अधिकाऱ्यांसह परराष्ट्र मंत्र्यांच्या सातत्याने संपर्कात असून, मुलांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी ओलिस ठेवलेल्या मुलांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
आज (२७ मार्च) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली. एमव्ही बीटू (imo no ९९१८१३३) हे डांबर वाहतूक करणारे जहाज वेस्ट आफ्रिकेच्या हद्दीत गेल्यानंतर समुद्री लुटारूंच्या (पायरेट्स) ताब्यात सापडले. या जहाजावर एकूण १८ क्रू मेंबर असून यातील १० जणांना हे हल्लेखोर आपल्या सोबत घेऊन गेले आहे. या दहा जणांमध्ये सात भारतीय तर तीन रोमेनियन नागरिक आहेत. समुद्राच्या आणि ओलीस ठेवलेल्यांमध्ये यामध्ये समीन जावेद मिरकर (रा. भाटकरवाडा, पेठकिल्ला, रत्नागिरी) आणि रिहान शब्बीर सोलकर (रा. कर्ला) या दोन रत्नागिरीतील तरुणांचा समावेश आहे.



याबाबत समीन आणि रिहान यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. कंपनीने अचानक जहाज हायजॅक झाल्याचे कळवले; मात्र अकरा दिवस उलटूनही अद्याप त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. मुलांच्या पालकांनी याबाबत मंत्री उदय सामंत यांच्यासह केंद्रीय मंत्री व अन्य संबंधित अधिकारी, मंत्र्यांशी ई-मेलद्वारे संपर्क साधला आहे. ओलीस ठेवलेल्या ठेवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या पालकांनी केली आहे. आपले मुले कोणत्या स्थितीत आहेत याबाबत गेले अकरा दिवस काहीही समजले नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय काळजीत पडले आहे.



