मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापुरात पूराचे पाणी ओसरले; स्वच्छता मोहिमेला वेग

राजापूर : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या राजापूर शहरात पाणी ओसरताच राजापूर नगरपालिकेने स्वच्छता मोहिमेला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शहरासह तालुक्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.

शनिवारपासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. परिणामी, शहरातील बाजारपेठेसह सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने रविवारी व्यापारी व्यवहार ठप्प झाले होते. तसेच वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता.

पूरस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

सोमवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर पुराचे पाणी ओसरू लागले. मात्र, शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि इतर परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल व कचरा साचल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. याची दखल घेत नगर परिषदेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवत रस्त्यांवरील चिखल हटविणे, कचरा उचलणे आणि परिसर निर्जंतुक करण्याचे काम सुरू केले आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका ग्रामीण भागालाही बसला होता. नदी-नाल्यांच्या पुरामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने भातलावणीची कामे काही काळ ठप्प झाली होती. मात्र, पाऊस थांबल्यानंतर शेतांतील पाणी ओसरू लागल्याने शेतकरी पुन्हा शेतीकामाला लागले असून तालुक्यात भातलावणीला पुन्हा वेग आला आहे.

दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे राजापूर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला असून शहरातील स्वच्छता आणि ग्रामीण भागातील शेतीची कामे आता वेगाने मार्गी लागत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!