दहिवली दुर्घटनेतील बाधितांना १०० टक्के मदत; पुनर्वसनासाठी नवा आराखडा
महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन

खेड : दहिवली येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज तातडीने दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल हे देखील उपस्थित होते. या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल आणि त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले आहे.
पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, “संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या आमचे मुख्य प्राधान्य ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हेच आहे. हा संपूर्ण भाग सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने संध्याकाळनंतर प्रचंड पाऊस आणि अंधारामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी आहेत. मात्र, तरीही एनडीआरएफचे ३० जवान दुर्घटनास्थळी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बचावकार्यासाठी आणलेली पोकलेन मशीनही तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे काहीशी घसरली व अडकली आहे, परंतु आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.”
डोंगराळ भागामध्ये नेटवर्क नसल्यामुळे मुख्यमंत्री यांच्याशी थेट संपर्क होऊ शकला नसल्याचे सांगत राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, शासनाचा प्रतिनिधी आणि राज्यमंत्री म्हणून सर्व बाधितांना आश्वस्त करू इच्छितो, मृतांच्या वारसदारांना योग्य ती मदत दिली जाईल. ज्या घरांचे नुकसान झाले आहे, ती घरे पुन्हा उभी करण्यासाठी शासन १०० टक्के आर्थिक मदत करेल. संपूर्ण सरकार या सर्व कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”
रत्नागिरी जिल्ह्यातील संवेदनशील आणि धोकादायक गावांच्या स्थलांतराबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले, “वर्षभरापूर्वी या संदर्भात बैठक घेतली होती. संपूर्ण जिल्ह्यात जिथे अशा दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणांचा शोध घेऊन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पुनर्वसनासाठी शासकीय किंवा खासगी जमीन संपादित करून ग्रामस्थांसमोर प्रस्ताव ठेवण्यात येईल. जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत स्थलांतर शक्य नाही, म्हणूनच जिल्ह्यासाठी एक नवीन आराखडा तयार केला जात असून, धोक्याच्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”



