राज्यात धुवांधार पाऊस
जनजीवन विस्कळीत, मुंबईतही तुफान पाऊस : ठाण्यात शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुंबईत पुढील दोन दिवसात मोठा पाऊस होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये एका शेतकऱ्याच्या गोठ्यात पूराचे पाणी आल्याने चक्क ५० म्हशी दगावल्याची दुर्घटना घडली.
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, मुंबईतही धुव्वादार पाऊस सुरू असून रस्त्यांना नद्यांचे रूप आले आहे. मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर सकाळपासूनच आहे. ठाण्यात अवघ्या ४ तासात ३१.२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना १८ आणि १९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे. तर, नवी मुंबईतही शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील हवामान तज्ज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून सतत धो- धो पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचसोबत ईस्ट वेस्ट शेअर झोन तयार झाला आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. संयुक्त प्रभाव म्हणून मुंबईसह कोकण आणि राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू आहे. पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे.



