प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यामध्ये उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
ॲड. संकेत साळवी यांच्या युक्ती वादाला यश

आबलोली (संदेश कदम) : क्रिकेटच्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यामध्ये उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. गुहागरचे वकील ॲड. संकेत साळवी यांच्या युक्तिवादाला यश आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुहागर तालुक्यातील आरे गावामध्ये ७ फेब्रुवारी रोजी रात्री १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास क्रिकेटच्या सामन्यांवरून झालेल्या वादात गावातील जयेश खोत नामक इसमाला अविनाश शेटे, ओमकार बोरकर आणि साईप्रसाद बोरकर या तिघांनी लोखंडी फाईट, जांभा दगडाच्या साह्याने बेदम मारहाण करून त्यास गंभीररित्या जखमी केले होते. या मारहाणीमुळे जयेश खोत हा सुमारे सहा दिवस रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होता. या घटनेनंतर गुहागर पोलिसांनी सुरुवातीला आरोपींविरुद्ध जी कलमे लावली होती त्या कलमांचा आधार घेऊन या तिन्ही आरोपींनी चिपळूण न्यायालयामधून अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मिळवला आणि ते तिघेही राजरोसपणे गावामध्ये वावरू लागले होते.
गुहागर पोलिसांनी आरोपी विरुद्ध लावलेल्या कमी शिक्षेच्या कलमांमुळे आणि त्यांना तातडीने अटक न केल्यामुळे आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यास मदत झाली असा आरोप करत फिर्यादी जयेश खोतच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला धडक दिली होती. त्या संदर्भातील व्हिडीओ क्लिप देखील सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यामुळे हा विषय संपूर्ण गुहागर तालुक्यामध्ये चर्चेचा बनला होता.
आरोपींना मिळालेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द व्हावा यासाठी फिर्यादी जयेश खोत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी फौजदारी वकील ॲड. संकेत साळवी यांची नियुक्ती केली. ॲड. साळवी यांनी फिर्यादी जयेश खोत याला झालेल्या मारहाणीचे फोटो आणि फिर्यादीला झालेल्या गंभीर दुखापतीचे वैद्यकीय प्रमाणपत्र सत्र न्यायालयामध्ये हजर केले. दरम्यानच्या काळात गुहागर पोलिसांनी देखील आरोपीविरुद्ध गंभीर गुन्ह्यांचे कलमे वाढवून लावली. या गुन्ह्याच्या तपास कामामध्ये गुहागर पोलिसांना अद्यापही लोखंडी फाईट जप्त करायची असल्याने आरोपींना कस्टडीमध्ये घेणे आवश्यक आहे असा युक्तिवाद ॲड. साळवी यांनी केला. फिर्यादीला झालेली मारहाण, घटनेचे गांभीर्य आणि पोलीस तपासासाठी आवश्यक असलेली आरोपींची कस्टडी या बाबींचा विचार करून चिपळूण सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
यानंतर हे तिन्ही आरोपी फरार होऊन त्यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या सुनावणी दरम्यान पुन्हा एकदा फिर्यादीला झालेली प्राणघातक मारहाण आणि आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी या बाबी उच्च न्यायालयासमोर प्रामुख्याने मांडण्यात आल्या. या सर्व बाबींचा विचार करून उच्च न्यायालय कोल्हापूर यांनी या घटनेतील प्रमुख सूत्रधार व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी अविनाश शेटे याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मुख्य आरोपी अविनाश शेटे हा अद्यापही फरार असून त्याला अटक करण्याचे आव्हान आता गुहागर पोलिसांसमोर आहे.



