मुख्य बातमीसामाजिक

गरीब विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक जमा करणाऱ्या विकास साखळकर यांची राष्ट्रीय पातळीवर दखल

"कोकण भूषण" या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : स्वतःचा व्यवसाय सांभाळून मागील १८ वर्षे सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या विकास शंकर साखळकर यांचा न्यायनिवाडा वेल्फेअर समिती (दिल्ली) या संस्थेच्या वतीने “कोकण भूषण” राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र दिन तसेच संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी (कोल्हापूर) येथे झालेल्या कार्यक्रमात श्री सद्गुरु आदिनाथ महाराज यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन श्री. साखळकर यांना सन्मानित करण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर श्री सद्गुरू किशोरनंद महाराज, हभप तात्या महाराज तसेच दत्तात्रय मांजरे हेमंत जावीर दयानंद जावीर, मारुतीराव सावंत, उमेश चावरे असे अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. साखळकर यांचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे.

समाजातील मूठभर लोकांच्या चांगुलपणावर समाजाचा रहाटगाडा ओढला जातो, या मुठभर लोकांच्या चांगुलपणाला काहीजण समाजकार्य म्हणतील तर काहीजण रिकामटेकडेपणा; मात्र रत्नागिरीचे सुपुत्र आणि पेशाने ड्रायव्हर असणारे विकास साखळकर यांच्याकडे पाहिल्यानंतर दातृत्व म्हणजे काय हा प्रश्न सहज सुटतो. गेल्या १८ वर्षात ४९ वेळा केलेले रक्तदान असो, माणुसकीची भिंत या छत्राखाली गोरगरीब लोकांसाठी कपडे वाटप असो किंवा यावर्षी चालू केलेला जुनी पाठ्यपुस्तके हा उपक्रम असो, प्रत्येक कामात त्यांनी आपला विशेष ठसा उमटवला.

परीक्षा झाल्यानंतर “जुनी पाठ्यपुस्तके रद्दीत कवडीमोलाच्या भावाने विकू नका ती माझ्याकडे द्या,” ती मी गरीब गरजू मुलांपर्यंत पोहोचवून त्यांना शिक्षणाचा मार्ग मोकळा करून देईन, या मथळ्याखाली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हाट्सअप ग्रुपवरती त्यांनी संदेश पाठवला होता. या संदेशाला भरभरून असा प्रतिसाद मिळाला. एकूण ३६ विद्यार्थ्यांची जुनी पाठ्यपुस्तके त्यांनी जमा केली. त्यापैकी यापूर्वीच त्यांच्याकडे मागणी केलेल्या २८ विद्यार्थी विद्यार्थिनींची पाठ्यपुस्तकाची गरज त्यांनी पूर्ण केली. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्याकडची जुनी पुस्तके साखळकर यांच्याकडे देऊन आपल्या पाल्यासाठी पुढील इयत्तेची पुस्तके मागून घेतली.

विकास साखळकर यांच्या याच कार्याची दखल घेत स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती (दिल्ली) संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या संस्थेने “कोकण भूषण” हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान केला. यापूर्वी त्यांना आदर्श रक्तदाता (रक्तदान क्षेत्रात काम करणारी रत्नागिरी मधील सर्वात मोठी अग्रगण्य संस्था जीवनदान गृप रत्नागिरी),

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (क्रांतीसुर्य सामाजिक संघटना वालचंदनगर, बारामती), महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा यांच्या सौजन्याने), विक्रमी रक्तदाता, (जिल्हा शासकीय रक्तपेढी आणि जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या सौजन्याने), समाजरत्न पुरस्कार (CBS मराठी न्यूज, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांच्या सौजन्याने), महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार

(हिरकणी महिला विकास संस्था पुणे आणि विसावा सोशल फाउंडेशन पुणे यांच्या सौजन्याने), जीवन भूषण पुरस्कार (नवक्रांती सेवाभावी संस्था बारामती आणि मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने) असे विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

स्वतःची आर्थिक झोळी फाटकी असताना सुद्धा ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचेच आपण काहीतरी देणे लागतो याच उद्देशाने काम करणाऱ्या विकास साखळकर यांना मिळालेल्या कोकणभूषण या राष्ट्रीय पुरस्कारामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!