बांधकाम कामगारांना अत्यावश्यक व गृहोपयोगी संचाचे रत्नागिरीतील एमआयडीसी वाटप केंद्र बंद

रत्नागिरी : बांधकाम कामगारांना अत्यावश्यक व गृहोपयोगी संचाचे वाटप करण्यात येते; सद्यस्थितीत रत्नागिरी एमआयडीसी येथे होणारी गर्दी लक्षात घेता याठिकाणचे वाटप केंद्र बंद करण्यात आल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी दिली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर व राजापूर या तालुक्यांमध्ये जिवित नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व गृहोपयोगी संच वाटप सुरू आहे. तथापि, सद्यस्थितीत रत्नागिरी तालुक्यातील सी-५, पिनोअर ब्रिक्स मिरजोळे, एमआयडीसी येथे वाटप सुरू असून, या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. काही महिला वर्ग रात्रीपासून याठिकाणी वस्तीला येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रसंगी त्यांच्या सुरक्षेचा विचार करता व गर्दी टाळण्याच्या दृष्टीने एमआयडीसी ठिकाणचे वाटप केंद्र बंद ठेवण्यात येत आहे.
यासंदर्भात रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत पातळीवर नियोजन करण्यात येत असून, ग्रामपंचायतनिहाय अत्यावश्यक संच व गृहोपयोगी संच वाटप करण्यात येईल, असे सहायक कामगार आयुक्त श्री. आयरे यांनी सांगितले.



