गुहागर आगारात लवकरच १५ नवीन बसेस
आमदार भास्कर जाधव यांच्या मागणीला परिवहन मंत्र्यांची मंजूरी

गुहागर : गुहागर आगारात असणाऱ्या बसेस खूप जुन्या असून गेली १०-१२ वर्ष या आगारासाठी नवीन बसेस पुरविण्यात आलेल्या नाहीत. जुन्या झालेल्या गाड्या वारंवार नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. तसेच अनेक बसेस गळक्या असून पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. तात्पुरती डागडुजी करून प्रवाशांची गरज भागवली जाते. हे लक्षात घेऊन गुहागर आगाराला १५ नव्या गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी शिवसेना नेते, मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. यासंबंधीचे पत्र आमदार श्री. जाधव यांनी देताच मंत्री सरनाईक यांनी ही मागणी मान्य करून तत्काळ संबंधितांना निर्देश दिले. त्यानुसार गुहागर आगाराला १५ नव्या बसेस मिळणार आहेत.
मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आमदार जाधव यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेतली. त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या आणि जुन्या झालेल्या वातानुकूलित शिवशाही बस बंद करून शिवाई, शिवनेरी यासारख्या नव्या गाड्या द्याव्यात, अशीही मागणी केली आहे. ही मागणीदेखील ना. सरनाईक यांनी मान्य केली आहे.



