प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाकडून आवाहन

आबलोली (संदेश कदम) : स्थानिक नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग आदी कारणाने नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढे सुरू ठेवण्यास मान्यता दिली. भात व नाचणी या पिकासाठी ही योजना लागू असून शेतकऱ्यांनी ३१ जुलै अखेर या प्रधान मंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुहागरचे तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, उपविभागीय कृषी अधिकारी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शेतीचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने पीक विमा योजना शेतकऱ्यासाठी वरदान ठरत आहे. बिगर कर्जदार शेतकरी वैयक्तिकरित्या आपले अर्ज आपले सरकार सेवा केंद्र, बँक सार्वजनिक सुविधा केंद्र इत्यादी ठिकाणी करू शकतात. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी, गावपातळीवरील सहाय्यक कृषी अधिकारी विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन गुहागरचे तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्याकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.



