मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सरंद येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

आबलोली (संदेश कदम) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथील कृषिकन्यांनी ग्रामीण जनजागृती कार्यक्रमांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील सरंद गावामध्ये गुरुपौर्णिमा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम जि. प. प्राथमिक शाळा, सरंद नं. १ येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.

या कार्यक्रमाची सुरुवात गुरुंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी शाळेचे शिक्षक रवींद्र घाणेकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कृषिकन्यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व, भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरा तसेच जीवनात गुरुंचे स्थान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचा आदर करणे, त्यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण घेणे आणि चांगले संस्कार अंगीकारणे याचे महत्त्व समजावून सांगितले.

यानंतर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सुंदर चित्रे काढून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. उत्कृष्ट चित्रे काढणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगासाठी आवश्यक असलेल्या स्टेशनरी साहित्याचे (पेन्सिल, रबर, शार्पनर इ.) तसेच चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि त्यांनी कृषिकन्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या कार्यक्रमास कृषिकन्या अनुष्का काजरोळकर, तन्वी सोलीम, पूर्वा जाधव व सुजाता बेंदगुडे उपस्थित होत्या. शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांप्रती आदरभाव, चांगले संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!