अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची ‘हवामान वेधशाळेस क्षेत्रभेट’ संपन्न

रत्नागिरी : येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील भूगोल विषयाअंतर्गत ‘वसुंधरा जिज्ञासा मंडळा’च्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी येथील हवामान वेधशाळेस आज (३१ जुलै) रोजी शैक्षणिक भेट दिली.
या अभ्यास भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हवामान निरीक्षणाची माहिती देणे, हवामान मोजणारी विविध यंत्रे प्रत्यक्ष पाहणे व हवामान अंदाज कसा तयार करतात हे समजावून घेणे हा होता. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना हवामान वेधशाळेतील विविध उपकरणांची माहिती व हवामान मोजण्याची प्रक्रिया, तापमापक यंत्र, आर्द्रतामापक यंत्र, पर्जन्यमापक, वाऱ्याचा वेग आणि दिशामापक ही उपकरणे व त्यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
पायलट बलून ऑब्सर्वेटरी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. सोनार, वैज्ञानिक सहाय्यक अनिलकुमार सिंह, सुमित खटावकर, अभिनव कुमार या तज्ञ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शंका समाधानासोबतच हवामान अंदाज कसा तयार होतो? ढग निर्मिती व प्रकार, ढगफुटी इत्यादीसंदर्भात माहितीदिली. याबरोबरच बलून मधून हवामानाचे निरीक्षण कसे करतात व त्याची सांख्यिकीय माहिती आलेखाद्वारे कशी नोंद केली जाते याविषयी सविस्तरपणे श्री. सोनार यांनी माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीचा मनःपूर्वक आनंद घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांची हवामान अभ्यासाबाबतची उत्कंठा अधिक वृद्धिंगत झाली. या क्षेत्रभेटीत मंडळाच्या २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ही क्षेत्रभेट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, कला विभागप्रमुख प्रा. वैभव कानिटकर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या क्षेत्रभेटीमध्ये महाविद्यालयातील वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे समन्वयक प्रा. दत्तात्रय माळवदे व सदस्य डॉ. राजेश कांबळे, प्रा. दिलीप जाधव, प्रा. सुनील भोईर आणि प्रा. योगिता गायकवाड उपस्थित होते.



